4.19.2006

हरवलंय सारं ....

हरवलंय सारं, जे अनुभवलं होतं कधी..
आता आहेत केवळ आठवणीं,
काही कडू काही गोड ...

आठवतात अजून ते
आजीच्या हातचे दहिपोहे,
घुमतात आजुनही कानात
देवघरातले आजोबांचे दोहे ...

दरवळतो आहे अजून हवेत
बागेतल्या त्या पहिल्या मोग-याचा सुगंध,
पावसात चींब भिजलेल्या धरेचा
तो सुखावणारा परिमल मंद ...

आंबले आहेत दात अजून
त्या हिरव्याकंच कैरिने,
भिजून शहारलंय मन आतुर
श्रावणातल्या त्या पहिल्या सरीने ...

कुठे गेल्या त्या संध्याकाळच्या
शुभंकरोति अन रामरक्षा,
हरवला का तो वासुदेव
अन त्याला दिलेली भिक्षा ...

पण खात्री आहे मला,
सापडतील सगळ्या गोष्टी हरवलेल्या ...
तो आजीचा हस्तस्पर्श, ते दहिपोहे, देवघरातले दोहे, त्या टवटवीत मोग-याचा गंध ...

परत घेवून जाईल मला तोच दरवळणारा मॄदगंध
माझ्या हरवलेल्या घराच्या दिशेने ....

~ ह्र षि के श

2 comments:

Anonymous said...

हृषीकेष,

छानच आहे कवीता.गोडवा आणि गेयता दोन्ही नीट साधलेत. ह्या उपक्रमासाठी खुप-खुप शुभेच्छा. आपल्या रचना नियमीत वाचायला मिळोत ही सदिच्छा. गुगल व्हिडीयो वापरुन केलेल्या नोंदी म्हणजे दुधात साखरच!

Kedar said...

Wah! farach chhan! Stumbled upon ur blog while orkutting...